Showing posts with label बीजेपी. Show all posts
Showing posts with label बीजेपी. Show all posts

Wednesday, June 16, 2010

नितीशकुमारांचा त्रागा

ताकाला जाऊन भांडे लपवायचे नसते. लपवलेले भांडे कोणाला दिसले म्हणून त्रागा करायचा नसतो. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त)नेते नितीशकुमार यांचा त्रागा अशाच स्वरूपाचा आहे. पाटण्यात भाजपा कार्यकारिणीची बैठक झाली. त्या निमित्ताने भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आले. त्यात नरेंद्र मोदीही होेते. नितीशकुमार व मोदी एकत्र हात उंचावत असल्याच्या छायाचित्रासह पानभर जाहिरात अनेक दैनिकांत आली. त्यामुळे नितीश यांचे डोके फिरले. जाहिरातीबद्दल राग येण्याचे मुळात कारण नाही. कारण भाजपाबरोबर ते बिहारची सत्ता उपभोगत आहेत. त्यातून राग आला तर भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते पाटण्यात होते. त्यांच्याजवळ नाराजी व्यक्त करायची. ते न करता पत्रकारांसमोर अनैतिक, असंस्कृत असे शब्द उच्चारले. एवढेच नव्हे तर भाजपाबरोबर युती असल्याचे विसरून एकदम कायदेशीर कारवाईची भाषाही बोलले. आता अक्षयकुमारची छबी त्याला न विचारता एखाद्या साबणाच्या कंपनीने व्यवसाय वृद्धी या व्यापारी हेतूसाठी वापरली तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. येथे त्याचा काय संबंध? त्यांची परवानगी घेऊन फोटो छापायला हवा होता हे खरे, पण दुसऱ्या मुख्यमंत्र्याबरोबर छापला तर नितीशकुमार यांच्या अंगाला इंगळ्या डसण्याचे कारण नाही. नितीशकुमार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर भाजपा नेत्यांसाठी रात्री ठेवलेली मेजवानी रद्द केली. तसेच कोसी नदीच्या पूरग्रस्तांसाठी गुजरात सरकारने दिलेली मदतही त्यांनी नाकारली. एकाच वेळी भाजपाबरोबर युती आणि त्याचवेळी भाजपाच्या एका मुख्यमंत्र्याचा दुस्वास हे अजब राजकारण आहे. नरेंद्र मोदी यांचा एवढा राग असेल तर भाजपाबरोबरची युती मोडून दाखवा, असे आव्हान लालुप्रासद यांनी नितीशकुमार यांना दिले आहे. आणखी काही महिन्यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यात मुस्लिमांची मते दुरावली जाऊ नयेत म्हणून नितीशकुमार असे उफराटे वागत आहेत. व्होट बॅंक समोर ठेवून राजकारण करणारा कॉंग्रेस पक्ष आणि नितीशकुमार यांच्यात फरक तो काय राहील? गुजरातच्या जनतेने एकदा नव्हे दोनदा मोदी यांच्या नेतृत्वावर विश्र्वास व्यक्त केला आहे. उद्योगपतींचा ओढा गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याकडे आहे. शेती व औद्योगिक क्षेत्रात गुजरातने लक्षणीय प्रगती केली आहे. नरेंद्र मोदी यांना कुशल प्रशासक म्हणून आता देश ओळखतो. ज्यांच्या डोक्यात सतत जातीयवादाचे किडे वळवळत असतात, त्यांनाच मोदी सलतात. इतके दिवस ते कॉंग्रेसवाले होते, आता त्यांच्या पंक्तीत नितीशकुमार जाऊन बसले आहेत. मोदीद्वेषामुळे काही जणांना नितीशकुमार तत्त्वनिष्ठ वगैरे वाटतील. तसे नाही. 2002 साली दंगल झाली तेव्हा नितीशकुमार वाजपेयी मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. भाजपाने मोदींना धक्काही लावला नाही. नितीशकुमारनी त्याचवेळी मंत्रिपद सोडायला हवे होते. या उप्पर विधानसभेची निवडणूक भाजपासोबत लढवली व भाजपाला उपमुख्यमंत्री पद दिले. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करताना जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी लालुप्रसाद यांच्याबरोबर हात उंचावून छबी दिली. विषय कोणताही असला तरी लालुप्रसाद यांना मिठी मारणे शरद यादवांना शोभले का? लालुप्रसाद- शरद यादव यांचे एकत्र फोटो तत्त्वात बसत असतील तर नितीश-मोदी फोटो अनैतिक कसा ठरतो ? खरे तर बिहारचे हजारो मजूर महाराष्ट्र गुजरातेत पोटासाठी गेले आहेत. त्या राज्यांवर तो भार आहे. त्याबद्दल आवाज उठवणारे राज ठाकरे यांना नितीशकुमार दूषणे देणार. मग या मजुरांना विशेषत: गुजरातमधील मजुरांना ते माघारी का बोलवत नाहीत? नितीशकुमारनी एक लक्षात ठेवावे भाजपामध्ये पक्षाध्यक्ष असो वा निम्न स्तरावरील कार्यकर्ता सर्व एकमुखी बोलतात. नरेंद्र मोदी यांचे भाजपामधील स्थान प्रत्येकाला मान्य आहे. भाजपामधून मोदी यांना अलग ठरवण्याचा नितीशकुमार यांचा प्रयत्न त्यानाच हास्यास्पद ठरवत आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा चालत असेल, तर त्यांनी भाजपाबरोबरची युती कायम ठेवावी अन्यथा शेजारच्या झारखंडमधील शिबू सोरेनचा रस्ता त्यांना मोकळा आहे.

Wednesday, June 3, 2009

...तर भाजपाने शिवसेनेचा नाद सोडावा




भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाने अंतिमोत्तर देऊन समझोत्याचे प्रयत्न करावेत. त्याला अपयश आल्यास भाजपाने शिवसेनेचा नाद सोडावा. मराठी अस्मिता हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व हा आमचा प्राण आहे! अशी भूमिका भाजपाने घ्यावी.
15 व्या लोकसभेचे निकाल जाहीर होऊन आता पंधरवडा होईल. केंद्रातील सत्ता मिळणे दूर, पण कॉंग्रेसपेक्षा भाजपाला 90 जागा कमी मिळणे याबद्दल हिंदुत्ववादी मनाला वाटणारा विषाद अद्याप ओसरला नसेल. अटीतटीची लढत होऊन सत्ता मिळाली नसती तर एवढे वाईट वाटले नसते, पण हा सामना एकतर्फीच झाला. पराभवाची अनेक कारणे दिली जातात. त्यात वरुण गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यावरील दोषारोप मला कृतघ्नपणाचे वाटतात. माझ्या मते विदेशी बॅंकांमधील भारतीयांचा काळा पैसा सत्तेवर आल्यानंतर परत आणू ही घोषणा लालकृष्ण अडवाणी यांनी आधीच करायला नको होती. त्यामुळे काळा पैसेवाले सावध झाले असतील. भाजपा सत्तेवर आल्यास आपण नंगे होऊ, या भीतीने त्यांनी या एकूण पैशापैकी एक-दोन टक्के म्हणजे 200-300 कोटी रु. भाजपाचे उमेदवार पाडण्यासाठी खर्च केले असतील. आपल्या निवडणूक प्रक्रियेत धनशक्तीचे महत्त्व वेगळे सांगायला नको. भाजपाच्या ज्या 50-60 जागा कमी झाल्या, त्याला हा पैसा कारणीभूत कशावरून नसेल?
केंद्रातील सत्ता का मिळाली नाही, याची कारणे शोधण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीला कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपेक्षा अधिक जागा का मिळाल्या नाहीत? याचा गांभीर्याने विचार करायला हवा. दिल्लीतील सत्ता गेलीच, मुंबईत प्रभुत्व घटले अशी दोन्ही गालावर आत्ता थप्पड बसली आहे. दिल्लीचे आपल्या हाती नाही, किमान महाराष्ट्रात तरी भाजपा-सेना युतीचा डंका वाजला असता तरी दिल्लीच्या दु:खावर फुंकर बसली असती. ही दुसरी थप्पड बसायला राज ठाकरे आणि त्यांचा मनसे हा पक्ष कारणीभूत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावा-भावातील भांडणे युतीच्या लज्जास्पद कामगिरीला कारणीभूत आहेत. कोणाच्या गृहछिद्रात डोकवायचे नसते; त्यामुळे या भावाभावाच्या भांडणाचे शिवसेना प्रमुख बघून घेतील अशी अनेकांची धारणा होती, पण आता हा ठाकरेंचा घरगुती मामला राहिलेला नाही. 26/11 च्या नरसंहारानंतरही मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा कॉंग्रेसलाच, अशी लज्जास्पद स्थिती असेल तर वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. ती न केल्यास राज ठाकरे विधानसभेच्या 200 जागा लढवून युतीचे पार वस्त्रहरण करून टाकतील हे नक्की! हा वेगळा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी करायला हवा.
पुत्रप्रेमापोटी उद्धवला वारस नेमले तरी राजने काढलेले मुद्दे, त्याच्या सभांना झालेली गर्दी आणि पडलेली मते पाहिली तर उद्धवपेक्षा राज सरस आहे, हे स्पष्ट होते. मतदानाचे आकडे जाहीर झाल्यावर राजला मातोश्रीवर बोलावणे आणि त्याचे मतपरिवर्तन घडवून मनसे विसर्जित करायला लावणे, तसेच उद्धवऐवजी राजला शिवसेनेचे कार्याध्यक्ष नेमणे अशा गोष्टी बाळासाहेबांकडून अपेक्षित होत्या, पण त्यांनी राजशी संबंध तोडले. दोन भावात समझोता करायला मनोहर जोशी पुढे सरसावले. हे असे व्हावे अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती, पण उद्धवने लगेच जोशींना झापले. सलोख्याच्या प्रयत्नांची वाट लागली! मनसे काढणे ही राजची चूक, त्याला न चुचकारणे ही बाळासाहेबांची चूक आणि सलोखा धुडकावणे ही उद्धवची चूक. तीनही ठाकरे चुकले! परिणामी युती 30 आघाडी 18 असे दिसणारे राज्यातील लोकसभेचे चित्र पुसले गेले.
आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. ठाकरे घराण्याच्या चुकीकडे भाजपा दुर्लक्ष करीत राहिला तर त्याचा फटका भाजपालाही बसेल. आता राम नाईक आणि किरीट सोमय्या यांना बसला तसा फटका विधानसभेच्या 30-35 जागांवर बसेल. 16-18 तास भारनियमन, पाण्याची ओरड, साध्वीचा छळ, अल्पसंख्यकांचे लांगूलचालन एवढी पापे करून आमच्या माथी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कुशासन येईल; हे टाळायचे असेल तर भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाने अंतिमोत्तर देऊन समझोत्याचे प्रयत्न करावेत. त्याला अपयश आल्यास भाजपाने शिवसेनेचा नाद सोडावा. मराठी अस्मिता हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व हा आमचा प्राण आहे! अशी भूमिका भाजपाने घ्यावी. बी.डी.जत्ती, निजलिंगप्पा, गुुंडूराव, वीरेंद्र पाटील या कॉंग्रेसी मुख्यमंत्र्यांची बेळगावबाबतची भूमिका भाजपाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा पुढे चालवीत आहेत. त्यांना संकुचितपणा येत नाही. राष्ट्रपतींचे पत्रही हिंदीतून आले तर न वाचता कचऱ्याच्या टोपलीत टाका असे म्हणणारे के. कामराज तर अ. भा. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. बंगालमध्ये 80 टक्के जागा बंगालींसाठी व चतुर्थश्रेणीच्या 100 टक्के जागा बंगालींसाठी असा कायदा करणारे ज्योती बसू यांना कोणी संकुचित म्हणत नाही, उलट एक काळ त्यांच्या नावाचा पंतप्रधानपदासाठी विचार झाला. हिंदुत्व भाजपाकडे आहेच, भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या भूमिकेची त्याला जोड दिली तर शिवसेना आणि मनसे या दोघांची आवश्यकता उरणार नाही. या नव्या भूमिकेकडे "उद्धव की राज?' अशा गोंधळात सापडलेल्या मराठी मनाला तिसरा पर्याय सापडेल. अजून 6 महिने आहेत. ही नवी भूमिका रुजवायला पुरेसा अवधी आहे.
भाजपापुढे शेवटचा पर्याय कॉंग्रेसच्या अनुकरणाचा आहे. कॉंग्रेसने 2004 साली बिहारमध्ये लालूप्रसाद आणि रामविलास पासवान या परस्परांशी कट्टर वैर असलेल्यांना यू.पी.ए.त एकत्र आणले. लालू आणि पासवान जर यू.पी.ए.त एकत्र येऊ शकतात, तर मनसे आणि शिवसेना एन.डी.ए.त एकत्र का येऊ शकणार नाहीत? सोनिया गांधींनी त्यावेळी बिहारमध्ये चोखाळलेला रस्ता भाजपाला आता महाराष्ट्रात चोखाळावा लागेल. दोघांची एकत्र मोट बांधण्यात भाजपा नेतृत्वाची कसोटी आहे. यापैकी काहीच न करता गप्प राहिल्यास, विधानसभेच्या निवडणुकीतही मनसेमुळे जबर नुकसान होणार! ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भाऊबंदकीचा आत्ताच विचार केला नाही तर विधानसभा निवडणुकीनंतरही आत्ताप्रमाणेच काळवंडलेल्या शोकमग्न चेहऱ्याने, टी.व्ही. कॅमेरे टाळत वावरावे लागेल!